पक्षिमित्र अंक
पक्षिमित्र
संपादक – किरण मोरे
इराण – इस्राईलच्या युद्धझळा भारतीयांना जाणवत आहेत. वाढती महागाई, पेट्रोल, गॅस टंचाई हे त्याचे सध्याचे रूप. ‘भांडवलशाही मानसिकतेचे लोक जगाला तिसऱ्या विश्वयुद्धाकडे ढकलत आहेत’ अशी शंका तज्ञ व्यक्त करत आहेत.
पक्षीजगताचा विचार करता, महाराष्ट्रामध्ये होर्मूझ मार्गे सेंट्रल एशिया “फ्लायवे” ने कितीतरी पक्षी स्थलांतर करून येतात. पश्चिम आशियातील हा भाग स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. ज्यावर युद्धाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. युद्धातील स्फोट धूर, आगीचे लोळ यामुळे पक्षांच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण होतात. रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करत असतात. त्यावेळी होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे, आगीमुळे पक्षांची दिशाभूल होते. तीव्र अशा प्रकाशझोतामुळे ते त्यांची नियोजित वाट चुकतात.
प्राणिमात्रांना देशकालाच्या मानवनिर्मित सीमा कळत नाहीत. ते “अवघे विश्वची आमचे घर” ह्या उक्तीला सार्थ करतात. पक्षी, ज्यांचे जगणे स्थलांतरावर अवलंबून आहे ते या सगळ्या परिस्थितीत भरडले जातात.
या सगळ्यांचा विचार या युद्ध प्रसंगी करणे गरजेचे ठरते.




















































